MIM MLA Akbaruddin Owaisi | संभाजीनगर : एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगाबादमधील खुलताबाद येथे औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि नेते वारिस पठाण होते.
औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने आता राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील एमआयएमच्या नेत्यावर सर्व पक्षाच्यावतीने टीकेची झोड उठवली आहे.
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेलं आव्हान असून आपण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका असा इशारा दिला आहे.
“औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
“औरंगजेब काय महान संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं, मंदिरं उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योद्ध्यांनी लढाई लढली आहे.
आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणं हे आव्हान दिल्यासारखं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत जाहीर आव्हान दिलं आहे. “मी आव्हान करतो…पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा…याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
याआधी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “ओवेसीला माहित आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
“खरं म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन कोणीच घेत नाही. कारण, तो औरंगजेब इतका दृष्ट होता की त्याने सगळ्यांनाच त्रास दिलेला आहे. हिंदुंच्या देव-दैवतांची मंदिरं तोडली, जिझिया कर लावला.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेत संत तुकाराम महाराजांची पालखी देखील अडवण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्म नष्ट करण्याचं त्याचे स्वप्न होते.
तो अतिशय दुष्ट राजा होता, म्हणून मुस्लीम धर्मातील लोकांनी देखील त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवलेलं नाही. तिथल्या अन्य दर्गावर लोक जातात, त्या दर्गा वेगळ्या आहेत परंतु औरंगजेबाच्या कबरीवर कोणीच जात नाही.
आता हे एमआयएमचे लोक तिथे जाऊन आले, यातून नवीनच काहीतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश दिसतो. तो काही बरोबर नाही.” असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्र सरकारला लोकांवर राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा भारी शौक आहे. एवढी जर तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा ना.
तुमची किती हिंमत आहे, किती साहस तुमच्यामध्ये आहे हे महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मावळ्यांना पाहायचंय. ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी जातो? काय कारण?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
“ज्या औरंगजेबानं आयुष्यभर छत्रपती शिवरायांना छळण्याचा प्रयत्न केला, कैद केलं. संभाजीराजांचे डोळे फोडले, जीभ छाटली. त्यांना क्रूरपणे मारण्यात आले.
देशाच्या मातीशी गद्दारी केली, त्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी डोकं टेकवण्यासाठी जात असेल तर तो गद्दार नाहीये का? तो राजद्रोह नाहीये का? या सरकारमध्ये जर हिंमत असेल, तर आधी ओवैसींवर राजद्रोह लावावा”, अशा शब्दांत राम कदम यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे.
भाजपसह सत्ताधारी शिवसेनेने ओवेसींवर टीका केली असतानाच आता आमदार रवी राणा यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजेंच्या विचारांचा महाराष्ट्र, ज्यामध्ये संभाजी नगरी येते आणि ओवेसी फुले वाहतात.
आजवरच्या माझ्या राजकीय जीवनात मी फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात त्या समाधीवर कोणीतरी जाते आणि नमाज पढते हे पहिल्यांदा पहिले आहे, हा महाराष्ट्राचा आणि छत्रपतींच्या बलिदानाच्या व संघर्षाचा अपमान आहे” असे राणा म्हणाले.
Also Read
- Using Old Cooler Use 3 Tips | कूलर हवा देत नाही, हे 3 उपाय करा, घर होईल कूल कूल
- व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन आता अधिक ‘शक्तीमान’ होणार ; कोणाचेही मेसेज थेट डिलीट करणार !
- Agriculture News : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी होतेय रेशीम व्यवसायाची वाडी
- Lesbian Girl Asked Police Protection | लेस्बियन मुली पोलिसांकडे धावल्या; एकत्र राहण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबांविरुद्ध तक्रार दाखल