Political News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण (Ashok Chawan) यांनी शुक्रवारी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली.
गेल्या काही दिवसांत दोन्ही नेत्यांची अनेकदा भेट झाली आहे. महाराष्ट्रात अशोक चव्हाण काँग्रेसला मोठा धक्का देऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. चव्हाण यांच्यासोबतच काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सोमवारी मुंबईत येत आहेत. यादरम्यान अशोक चव्हाण अमित शहा यांची भेट घेऊ शकतात, असे बोलले जात आहे.
केवळ अशोक चव्हाणच नाही तर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chawan), प्रणिती शिंदे (Praniti Shinde), धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) आदी आमदारही काँग्रेसवर नाराज असल्याचे बोलले जाते.
हे सर्वजण भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. चला जाणून घेऊया अशा प्रकारच्या अटकळ का आहेत? याचा काय परिणाम होईल?
काँग्रेसमध्ये खरेच फूट पडू शकते का?
हे समजून घेण्यासाठी कॉंगेसची संस्कृती व नेत्यांचे वागणे समजून घेतले पाहिजे. दिल्ली दरबारी राजकारण आणि राज्यातील नेत्यांचे राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे.
अशोक चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये गेल्यास त्याचा भाजपला कसा फायदा होईल, याचे अंदाज व्यक्त केले जात असले तरी काँग्रेसला कोणते नुकसान सोसावे लागेल? हे पाहणे खूप महत्वाचे आहे.
पक्षनेतृत्वावर आमदारांची नाराजी
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत सुरू नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या भागाला सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार करत राहिले.
काँग्रेस आमदारांच्या क्षेत्राचा विकास होत नाही. विकासकामांसाठी निधी दिला जात नसल्याचा आरोपही काँग्रेसच्या आमदारांनी वारंवार केला.
आमदारांनीही सोनिया गांधी यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. काँग्रेस नेतृत्वाच्या या वृत्तीवर आमदारांमध्ये नाराजी होती.
स्वतःच्या भवितव्याची चिंता
राष्ट्रीय स्तरापासून ते ब्लॉक स्तरापर्यंत काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांचे काँग्रेसमधील भवितव्य सुरक्षित नसल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागले आहे.
एकापाठोपाठ एक निवडणुकीतील पराभवाने नेत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदारही त्यांच्या व त्यांच्या वारसांच्या राजकीय भविष्यासाठी ‘पर्याय’ शोधत आहेत. त्यांना भाजपपेक्षा सशक्त पर्याय सध्या दिसत नाही.
कोणत्या आमदारांची पक्ष बदलण्याची शक्यता आहे?
जूनमध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होट केले होते. या सर्व आमदारांनी भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे.
जुलैमध्ये उद्धव ठाकरेंच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर फ्लोअर टेस्ट झाली. यावेळी काँग्रेसचे 10 आमदार गायब होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दीकी, प्रणती शिंदे, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहनराव हंबर्डे आणि शिरीष चौधरी या दहा काँग्रेस आमदारांनी फ्लोर टेस्टमध्ये भाग घेतला नाही.
अशोक चव्हाण हे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रणीती शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशील शिंदे यांच्या कन्या आहेत. मतदाना दरम्यान विधानसभेत न आलेल्यां मध्ये धीरज देशमुख हे तिसरे मोठे नाव आहे.
धीरज देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत. तर दिलीपराव देशमुख यांचे पुतणे आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही काँग्रेस हायकमांड विरोधात बंडखोर भूमिका घेत आहेत.
काँग्रेसचे नेते आले तर भाजपला किती फायदा होईल?
सध्याचे राजकारण पाहता, काय घडू शकते आणि काय घडणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
भोकर मतदारसंघातून ते आमदार आहेत, त्यांचे वडीलही निवडणूक जिंकत आले आहेत. या जागेशिवाय जवळपास 10 जागांवर अशोक चव्हाण यांची पकड असल्याचे मानले जात आहे.
आजपर्यंत भाजप येथे जिंकू शकलेला नाही. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास पक्षाला 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
आणखी एक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेस सोडल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण हे 1991 पासून सलग तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले.
1999 मध्ये ते येथून निवडणूक हरले. यानंतर ते 2002 ते 2010 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. केंद्र सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही मिळाले. 2010 ते 2014 पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
पृथ्वीराज 2014 पासून कराड दक्षिण मतदारसंघातून आमदार आहेत. या जागेशिवाय जवळपास 12 जागांवर त्यांची चांगली पकड असल्याचे मानले जाते.
या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. कराड दक्षिणमधून आजपर्यंत भाजपला विजय मिळवता आलेला नाही. पृथ्वीराज भाजपमध्ये गेल्यास पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणती शिंदे याही एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर होत्या.
प्रणतीचे वडील सुशील कुमार शिंदे यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर चांगली पकड आहे. 1874, 1980, 1985, 1990, 1992, 2003, 2004 मध्ये सुशील यांनी सोलापूरच्या वेगवेगळ्या जागांवरून निवडणूक जिंकली आहे.
त्यांची मुलगी प्रणती 2009 पासून सोलापूरच्या शहर मध्य मतदारसंघातून आमदार आहेत अशा स्थितीत या जागेवर भाजप खूपच कमकुवत मानला जात आहे. सोलापूर आणि आसपासच्या जवळपास 10 जागांवर भाजपला फायदा होऊ शकतो.
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रणती शिंदे यांच्याप्रमाणेच धीरज देशमुखही पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. धीरज देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत.
लातूर विधानसभा, लोकसभेच्या जागेवर धीरज आणि त्यांच्या कुटुंबाची चांगली पकड आहे. सुमारे दहापेक्षा जास्त जागांवर देशमुख कुटुंबाचा प्रभाव आहे.
2019 मध्ये लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख आणि लातूर शहरातून त्यांचे बंधू अमित देशमुख विजयी झाले होते. अमित 2009 पासून लातूरचे आमदार आहेत.
पूर्वी त्यांचे वडील विलासराव देशमुख येथून आमदार होते. आजपर्यंत ही जागा भाजपला जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत देशमुख कुटुंबीय भाजपमध्ये गेल्यास पक्षाला मोठा फायदा होणार आहे.