Mahavitaran : घरात तीन बल्ब आणि एक पंखा, वीज बिल मात्र 1.29 लाख रुपये; महावितरणचा ढिसाळ कारभार

electricity distribution department
प्रातिनिधीक छायाचित्र

पालघर : जिल्ह्यातील वीज वितरण विभागाचा ढिसाळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. डहाणू येथील धानिवरी कोठबीपाडा येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्याला वीज वितरण विभागाने मासिक 1 लाख 29 हजार रुपयांचे बिल दिले आहे.

वार्षिक उत्पन्न 20 हजारांच्या जवळपास असलेल्या गायकर कुटुंबाला अचानक लाखोंचे बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

डहाणूतील धानिवरी कोटबीपाडा येथील अजिस बाबू गायकर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला.

त्यामुळे घरात फक्त तीन बल्ब आणि एक पंखा एवढा मर्यादित वीज वापर आहे. गायकर कुटुंबाला गेल्या अनेक महिन्यांपासून 300 ते 600 रुपये वीज बिल येत होते.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही गायकर कुटुंबीय गेल्या अनेक महिन्यांपासून वीज बिल नियमित भरत होते. मात्र आता या कुटुंबाचे सप्टेंबर महिन्याचे वीज बिल 1 लाख 29 हजार रुपये आले आहे.

त्यामुळे हे वीज बिल कसे भरायचे, असा गंभीर प्रश्न गायकर कुटुंबियांसमोर आहे. तीन दिवे आणि एक पंखा याशिवाय घरात टीव्ही, फ्रीज असे कोणतेही विद्युत उपकरण नाही.

मात्र असे असतानाही लाखोंचे बिल आल्याने गायकर कुटुंबीयांची झोप उडाली आहे. याबाबत सामान्य वीज वितरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत बिल भरावे लागेल, असे सांगितल्याचा आरोप गायकर कुटुंबीयांकडून केला जात आहे.

वीज वितरण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा त्रास डहाणूतील धानिवारी कोठबीपाडा येथील अजिस गायकर यांना एकटा नाही. या ब्लॉकमधील 20 हून अधिक कुटुंबे सध्या याच वीज बिलामुळे चिंतेत आहेत.

यातील अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील आहेत आणि या घरांमधील विजेचा वापर खूपच कमी आहे. येथील वीज ग्राहक महिन्याअखेरीस नियमितपणे 400, 500, 600 रुपये वीज बिल भरतात.

मात्र, येथील अनेक वीज ग्राहकांना 26 हजार, 61 हजार, 75 हजार तर काहींना थेट दीड लाखांपर्यंत वीजबिल देण्यात आले आहे.

वीजबिल न भरल्यास घरांवर लावलेले मीटर काढून टाकण्यात येतील, असा इशारा महावितरण या वीज ग्राहकांना देत आहे.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हे वीज ग्राहक आपल्या खिशातून 400 ते 500 रुपये खर्च करून दररोज वीज वितरण विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारूनही त्यांना अपेक्षित उत्तर मिळत नाही.

वीज वितरण विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात वीज ग्राहकांचा आक्रोश आपण नेहमीच पाहतो. वीज वितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनाही मोठा फटका बसत आहे.

मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांच्या निरक्षरतेचा फायदा घेत वीज वितरण विभागाकडून त्यांची लूट केली जाते. नियमित रीडिंग न घेतल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे महावितरणचे म्हणणे असले तरी त्यांनी कॅमेऱ्यासमोर अधिक काही बोलण्यास नकार दिला आहे.