उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा झटका, दिल्ली उच्च न्यायालयाकडून धनुष्य बाणाचा चेंडू निवडणूक आयोगाकडे

Delhi High Court sent Uddhav Thackeray to Election Commission for symbol and name

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर आज सुनावणी झाली. ठाकरे गटात सुमारे तास ते दीड तास वाद झाला. त्यानंतर उद्या पुन्हा सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे नाव आणि पक्षाच्या चिन्हावरील निर्णयाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगू शकतो. याप्रकरणी उद्या लेखी म्हणणे मांडावे”, असा सल्ला दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिला आहे.

ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी ठाकरे गटाला आपले लेखी म्हणणे मांडावे लागणार आहे.

दरम्यान, पक्षाच्या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो, असे न्यायालयाने ठाकरे गटाला सांगितले आहे. त्यामुळे आता ठाकरे गट काय पाऊल उचलतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेना पक्षाच्या चिन्ह आणि नावावर लवकर निर्णय घेण्याची विनंती केली होती.

त्यांच्या विनंतीची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून कागदपत्रे मागवली होती. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नाव वापरण्यास मनाई केली होती, तसेच धनुष्यबाण चिन्हही गोठवले होते. त्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळी नावे व चिन्हे देण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट दिल्ली उच्च न्यायालयात गेला होता. त्यांच्या याचिकेवर आज (14 नोव्हेंबर) न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णयाचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोर्टात जोरदार युक्तिवाद

दरम्यान, आज दिल्ली उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मी पक्षाचा अध्यक्ष असून 30 वर्षांपासून पक्ष चालवत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.

निवडणूक आयोगाचा निर्णय प्रथमदर्शनी काय आहे यावर आधारित आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

निवडणूक आयोगाचे चिन्ह गोठवण्याचा आदेश बेकायदेशीर आहे, ठाकरे गटाचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या राजकीय हालचालींना खीळ बसली आहे. माझ्या वडिलांनी दिलेले नाव आणि चिन्ह मी वापरू शकत नाही, असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

निवडणूक आयोगाने विचारलेल्या सर्व बाबी आम्ही पूर्ण केल्या आहेत. आम्ही सर्व कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात उपस्थित केला.