उदगीर : ऐतिहासिक किल्ल्याची साफसफाई करताना बुरुजाखालील गुहेत दोन ट्रक तोफखाना आणि पाच तोफा सापडल्या.
पानिपतची लढाई सुरू होण्यापूर्वी उदगीर येथे निजाम आणि पेशव्यांची लढाई झाली. त्यामुळे या किल्ल्याला खूप महत्त्व असून हा किल्ला 14 व्या किंवा 15 व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे.
हिंदू सामाजिक महासंघ हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी सावळे, सोलापूरचे किशोर माने, उस्मानाबादचे नागेश जाधव, औरंगाबादचे दत्तू हाडोळे आणि २६ जिल्ह्यांतील ८० स्वयंसेवकांचे पथक उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याची मागील चार दिवसांपासून स्वच्छता करीत आहेत.
किल्ल्याच्या भिंतीवर वाढलेली झाडे-झुडपे काढणे, किल्ल्यातील विहिरीतील गाळ काढणे, विहिरींची साफसफाई, लेणी साफ करणे, भिंतींवरील अश्लील चित्रे धुणे अशी कामे ही टीम स्वखर्चाने करत आहे.
दरम्यान, सोमवारी किल्ल्याच्या बुरुजाखालील गुहा साफ करताना पथकाला शिवकालीन तोफांचे अंदाजे दोन ट्रक तोफगोळे आणि पाच तोफांचे अवशेष सापडले आहेत.
पथकाला सतीश उस्तुरे, प्रशांत मांगुळकर, विहिंपचे सतीश पाटील, सावन टांकसाळे, डॉ. प्रशांत राजूरकर, रामचंद्र चव्हाण, अरविंद शिंदे यांनी सहकार्य केले.
चौदाव्या-पंधराव्या शतकातील तोफखाना
1760 मध्ये उदगीर येथे निजाम आणि मराठे यांच्यात लढाई झाली. या युद्धात मराठे जिंकले आणि पुढील मोहिमेवर गेले. मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे आपल्या सैन्यासह पानिपतकडे निघाले.
पानिपतची लढाई उदगीरपासून सुरू झाल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ल्यात सापडलेला तोफखाना हा 14 व्या किंवा 15 व्या शतकातील असल्याचे मानले जाते, असे शिवाजी पवार यांनी सांगितले.
26 जिल्ह्यांतील 80 स्वयंसेवक
हिंदू सामाजिक महासंघ हिंदुस्थानचे अध्यक्ष शिवाजी पवार आणि बनशेळकी (ता. उदगीर) येथील कार्यकर्ते शिवाजी सावळे यांची रायगड येथे भेट झाली. त्यावेळी सावळे यांनी पवार यांना उदगीर किल्ल्याची माहिती दिली.
त्यामुळे राज्यातील 26 जिल्ह्यातील 80 स्वयंसेवकांनी उदगीर किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला, अशी माहिती शिवाजी पवार यांनी दिली आहे.