जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

औरंगाबाद : औरंगाबाद- जालनारोडवरील गाढे जवळगाव फाट्यावर बस- आणि पिकअपच्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले.

तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, भरधाव वेगाने एक पिकअप जीप ( एमएच २१ बीएच ४३३१) जालन्याकडून औरंगाबादच्या दिशेने येत होती.

गाढे जालना रोडवरील जवळगाव फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप अचानक दुभाजकावर चढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली.

याच दरम्यान जालन्याकडे जाणारी पुणे-कळमनुरी बस समोर आली. बस चालकाने प्रसंगावधान राखत डाव्या बाजूला बस घेतली. मात्र, पिकअप बसवर आदळली.

यात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर तिघे जण गंभीर जखमी आहेत.

मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे.

अपघात एवढा भीषण होता की पिकअपचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

माहिती मिळताच करमाड पोलिसांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक प्रभावित झाली होती. पोलीसांनी प्रयत्नपूर्वक वाहतूक सुरळीत केली.

मृतांची नावे अशी आहेत :
1. लहू ज्योतीराम राठोड (वय 50 वर्ष राहणार रेणुका नगर औरंगाबाद)
2. अशोक जयसिंग चव्हाण (राहणार सातारा तांडा)
3. चव्हाण रणजित जयसिंग चव्हाण (राहणार सातारा तांडा)
4. शांतीलाल हरी चव्हाण (राहणार सातारा तांडा)
5. लता उर्फ पारूबाई ज्ञानेश्वर जाधव (राहणार राज नगर बीड बायपास, औरंगाबाद)

जखमींची नावे :
6. विकास ढेरे
7. रोहित विकास ढेरे
दोघे राहणार गुरु लॉन्सच्या पाठीमागे बीड बायपास, औरंगाबाद