Devendra Fadnavis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

शिर्डी (अहमदनगर) : जेव्हा राज्य सरकारला सत्य नाकारता येत नाही त्यावर कोणतेही उत्तर नसते. आम्ही आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यानिशी मांडली असून, मुंबई महापालिकेत कोविडच्या ( Devendra Fadnavis On BMC Scam ) काळात कशी लूट झाली याची सगळी उदाहरणे दिली.

याबाबत कुठल्याच गोष्टींचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे नव्हते म्हणून त्यांनी भावनिक भाषेत उत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांंना केले.

तथ्यांच्या आधारावर कारवाई

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डीत साईदरबारी हजेरी लावून मनोभावे दर्शन (Devendra Fadnavis At Shirdi ) घेतले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, आम्हाला कोणाच्याही कुटुंबापर्यत जायचे नाहीये. कुटुंबापर्यत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

कुठलीही एजन्सी कोण कोणाचा नातेवाईक आहे हे बघून कारवाई करत नाही. तथ्याच्या आधारावर कारवाई होत असते.

स्वबळावर सत्ता आणणार

मुख्यमंत्र्यांनी आम्ही सत्ता तुम्हाला देतो, तुमच्याबरोबर यायला तयार आहे, असे म्हटले होते. यावर बोलतांना त्यांनी सांगितले की, याविषयी फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

आम्ही 2024 च्या तयारीत असून, कुठल्याही परिस्थितीत स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. राज्य सरकारची जबाबदारी आहे की, त्यांनी भ्रष्टाचाराचे उत्तर दिले पाहिजे.

अनिल परब यांच्या रिसोर्टवर किरीट सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा दाखवला आहे. शेवटी कारवाई ज्या काही संस्था तसेच न्यायालय करत आहे. आमची संघर्षाची भुमिका आहे.

आम्ही कुठल्याही कारवाईला दबणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध जो आवाज आम्ही उठवतो तो यापुढेही उठवत राहाणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.